माझे आयडॉल माझे बाबा
"गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही या मिळाल्या"
रेडिओवर कवी बी उर्फ मुरलीधर गुप्ते यांनी लिहिलेले गाणे चालू होते. रडणाऱ्या मुलीचे बाबा आपल्या चिमुरडीला रडण्याचे कारण विचारत होते. तिची समजूत घालत होते. मुलीच्या डोळ्यात अश्रू पाहून ते व्याकूळ झाले होते. जसे पिल्लू आपल्या आईच्या पंखाखाली सुरक्षितपणे विसावते तसे मी माझ्या बाबांच्या छत्रछायेखाली सुखात होते. माझे बाबा खूप शिकलेले किंवा फार मोठ्या पदावर नोकरीला नव्हते पण आम्हाला सुखी करण्यासाठी अहोरात्र झटत असायचे. आमच्या सर्व गरजा पूर्ण करून ते आमच्या शिक्षणाला संपूर्ण पाठिंबा देत.
माझे बाबा एका माध्यमिक शाळेत शिक्षक होते. आम्हा भावंडांना त्यांचा धाक असला तरी आमच्या अभ्यासाकडे आणि वर्तनाकडे त्यांचे नियमित लक्ष असायचे. ते आमच्याशी खेळकरपणे वागत पण आमचे काही चुकले तर वेळीच जाणीव करून देत. त्यांना फावला वेळ मिळाला की ते आम्हाला गणितातील कोडी आणि उदाहरणे सोडवायला देत.
आमचा अभ्यासातील पाया पक्का व्हावा असा त्यांचा नेहमीच प्रयत्न असायचा. त्यांचे आवडते विषय म्हणजे व्याकरण आणि गणितातील पाढे. आजही त्यांचे व्याकरणातील नियम आणि पाढे मुखोद्गत आहेत. माझ्या बाबांना कविता करण्याचा छंद आहे. नुकताच त्यांनी 'सुवर्णपान' शीर्षकाचे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यांना आत्मचरित्र लिहिण्यासाठी आम्ही भावंडांनी खूप पाठिंबा दिला. त्यांना निवृत्त होण्यापूर्वी 'आदर्श शिक्षक पुरस्कार 'मिळाला होता. माझ्या बाबांना वाचनाचा खूप नाद पण कमी वयात त्यांच्यावर आईवडील आणि भावंडांची जबाबदारी पडली.त्यांनी त्यांची सर्व जबाबदारी मेहनतीने आणि मोठ्या हिकमतीने पेलवली.
कोणताही विषय शिकवण्याची त्यांची हातोटी आणि पद्धत इतकी सोपी असे की मुले त्यांच्या तासाला रमून गेलेली दिसायची. माझ्या बाबांचे वाचन इतके अफाट आहे की कोणताही विषय शिकवताना ते अनेक दाखले देऊन तो मुद्दा पटवून देत असत. रसाळ भाषेतून कवितेचे रसग्रहण करताना आपण त्या काव्यसागरात जणू डुंबून जातो. त्यामुळेच आमच्या शाळेच्या ग्रंथालयात ज्ञानेश्वरी, अभंगगाथा, दासबोध यासारखे ग्रंथही बाबांनी संकलित करून ठेवले आहेत. बाबांना परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता आले नाही याची जाणीव असल्याने कितीतरी गरीब मुलांच्या शिक्षणाला आर्थिक हातभार लावत. सरकारकडून किंवा संस्थांकडून मदत मिळवून देत. बाहेरून काटेरी दिसणारा फणस आतून गोड गऱ्याने भरलेला असतो तसे माझे बाबा बाहेरून कडक आणि शिस्तीचे असले तरी आतून स्वभावाने खूप हळवे आणि भावनाप्रधान आहेत. गरिबांचा त्यांना फार कळवळा असल्यामुळे त्यांचे मित्रही साध्या राहणीमानाचे आणि परिस्थिती गरीब असणारे आहेत.
माझे बाबा बऱ्याच होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी देत. 'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले| तोचि साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा ||असे म्हणणाऱ्या तुकारामांच्या जातकुळीतील माझे बाबा माझे प्रेरणास्थान होते आणि आजही आहेत. लोकांना मदत करायला ते नेहमी तत्पर असतात. माझ्या बाबांचा
रिकामपणातला उद्योग म्हणजे बागकाम.ते तासन् तास बागेत रमतात. तिथल्या फुलांपानांशी हितगुज करतात. बागेतील सर्व रोपट्यांची आपल्या लेकरांप्रमाणे निगा राखतात. ते म्हणतात, " या वृक्ष लतिकांनाही जीव आहे.त्यांचा चीक म्हणजे त्यांचे रक्त! म्हणून त्यांची पाने ओरबाडू नका. हवी असतील तरच हळूवार खूडा".
मुक्या फुलांपानांवर प्रेम करणारे ते झाडांचे डॉक्टरच जणू! बागेतील फुलझाडांची सेवा करत साफसफाई करणे यात त्यांचा पूर्ण वेळ जातो. त्यामुळे त्यांना भेटायला येणाऱ्यांना त्यांचे दर्शन होते ते बागेतच! माझे बाबा प्रेमळ असले तरी आमचे वावगे वर्तन अजिबात खपवून घेत नसत. आम्हा भावंडांवर ते समान प्रेम करतात. आमच्या आवश्यक त्या मागण्या ते पूर्ण करत पण फाजील लाड कधीही पुरवत नसत. त्यांच्या हृदयात आम्हां मुलांसाठी वात्सल्याचा झरा नेहमीच वाहत असतो.
ते सहसा कोणाचे मन दुखवत नाहीत. कोणाला अभ्यासात काही अडले तर समर्पक उदाहरणे देऊन ते समजावून देतात. त्यामुळे तो भाग सोपा जातो. त्या पाठातील प्रसंग जसेच्या तसे डोळ्यापुढे उभे राहतात. माझ्या बाबांचे आम्हा सर्वांवर जसे प्रेम आहे तसेच प्रेम आजी आजोबा तसेच काका आत्यावरही आहे. कारण माझ्या काकांचे उच्च शिक्षण आणि आत्याच्या लग्नाची जबाबदारी देखील माझ्या बाबांनी निर्विघ्नपणे पार पाडली आहे. कुटुंबातील कोणत्याही कार्यक्रमात माझे बाबा अग्रस्थानी असतात. माझ्या बाबांना कविता आणि चित्रपटातील गाणी फार आवडतात . साहित्य संमेलनाच्या काळात माझे बाबा बरेच दिवस फिरतीवर असतात, कारण माझे बाबा उत्तम वक्ते आहेत. त्यामुळे बऱ्याच संस्थांकडून त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रण मिळते. ते बाहेरगावी गेले की आम्हाला खूप चुकल्यासारखे वाटत असते. माझे बाबा स्वावलंबी आहेत. स्वतःचे काम स्वतः करावे अशी त्यांची आम्हाला शिकवण असते. ते स्वयंपाकही छान बनवतात. मला पोळ्या बनवायलाही त्यांनीच शिकवले. माझे बाबा सर्वगुणसंपन्न असूनही खूप साधे आहेत .महात्मा गांधींच्या 'साधी राहणी उच्च विचारसरणी' या वर्तन शैलीचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव आहे. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या जीवनातील यशात त्यांच्या बाबांचा जसा सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच लता मंगेशकर आपल्या बाबांविषयीचे प्रेम व्यक्त करताना अभिमानाने गात
"कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला" या काव्यपंक्तीप्रमाणे माझे बाबा माझ्यासाठी कल्पवृक्ष आहेत. मी कुणीतरी बनावे यासाठी ते सतत मला प्रोत्साहन देत असत. त्यांच्या संस्कार आणि सद्गुणामुळे आज मी उच्चशिक्षित आणि प्रख्यात लेखिका, कवयित्री बनले.त्यांनी दिलेले माणूसकीचे धडे आमच्या नसानसात भिनले आहेत. माझ्या बाबांच्यावर सर्वांनी प्रेम करावे असे त्यांचे महान कार्य आहे. वाटेवरच्या पांस्थस्थालाही हाक मारून पाणी, चहा पाजण्याची त्यांची सवय आमच्यात रूजली आहे. घरात आलेला अतिथी भुकेल्या पोटाने परतलेला कधीच मला आठवत नाही.माझ्या बाबांच्या स्वभावातच गरीबांविषयीचा कळवळा असल्याने दारावरचा भिक्षूकपण आशीर्वादाचे बोल बोलून, तृप्त होऊन जातो.
किती वर्णावे त्यांचे गुण
डोळे आठवांनी पाणावले
मिळता त्यांच्या मायेची पाखर
सुख माझे पहा असे दुणावले
लेखिका सौ. भारती दिलीप सावंत
खारघर, नवी मुंबई
9653445835
Join WhatsApp Group Today
https://chat.whatsapp.com/DilsYhuRDjS4VNhKvtbX3L
Shikshak Dhyey India App download Today
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwn

