संपादकीय...
विद्यार्थ्यांना कौशल्य शिकण्याची संधी
शाळेतच मिळाली पाहिजे
“भारतातील जवळपास ८० टक्क्यांपेक्षा जास्त युवक हे
कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी नेमण्यास उपयुक्त नाही.” असे खळबळजनक पण धक्कादायक
वाटणारे विधान इन्फोसिस कंपनीचे संस्थापक अध्यक्ष नारायणमूर्ती यांनी केले. आज
देशातील ५० हजारांपेक्षा अधिक नोकऱ्या आवश्यक कुशल मनुष्यबळाअभावी पडून असल्याचा
अहवाल एका अर्थविषयक मासिकाने नुकताच प्रसिद्ध केला आहे.
ब्रिटीश शिक्षण पद्धतीमध्ये फक्त भाषा (इंग्रजी) आणि शास्त्र
याविषयांवर भर होता. हळूहळू कौशल्य विकास शिक्षणातून लुप्त होत गेला. गेल्या पन्नास
वर्षात शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानही वरवर दिले जाते. पदवीधर व्यक्तीचे ज्ञानही
सखोल नसते आणि काही कौशल्य अंगी बाणलेले नसते. कमालीच्या पुस्तकी, साचेबंद,
बदललेल्या मार्केट किंवा परिस्थितीच्या गरजांपासून आणि तरीही दिवसेंदिवस खर्चिक
बनत चाललेल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेकडे पुस्तकी आणि ‘घोकलेल्या’ माहितीपलीकडे न
जाऊ शकणारे आणि मुलभूत कौशल्याचा अभाव असणारे मनुष्यबळ आपली शिक्षणव्यवस्था
‘घाऊकपणे’ जन्मास घालत आहे. बदललेल्या बाजारपेठांच्या गुंतागुंतीच्या गरजांमध्ये
ज्यांचा उपयोग काडीमात्र नाही.
भारताला येत्या काळात सुमारे पाच कोटी व्यवसाय कौशल्य असणाऱ्या कुशल
मनुष्यबळाची विविध क्षेत्रात गरज आहे. कौशल्य शिक्षण
हा शिक्षणाचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. विद्यार्थ्यांच्या अंगात अनेक
अनमोल गुण असतात. सर्वप्रथम स्व:ची ओळख करून घ्या. आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळखणे व त्यात
करिअर करणे.
आपल्या देशात कुशल मनुष्यबळाचे प्रमाण फक्त २० टक्केच आहे. भारतात
आजही ८३ टक्के युवकांना शासकीय नोकरी अनुकूल वाटते. विद्यार्थ्यांना त्यांच्या
आवडीचे कौशल्य शिकण्याची संधी शाळेतच मिळाली पाहिजे.
भारतात व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था आयटीआय, तंत्रनिकेतन, अभियंता कॉलेजची स्थिति फारशी समाधानकारक नाही. प्रात्यक्षिक करण्यासाठी कच्चा माल आणि पुरेशी मशीनरी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे पण प्रत्यक्षात असे घडते का? याचा विचार विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी करण्याची वेळ आता आली आहे.
करिअर विशेषांक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
