शिक्षणप्रेमी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 



शिक्षणप्रेमी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर


   " शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे". हे दूध जो कोणी पितो तो वाघासारखे गुरगुरल्या शिवाय राहत नाही. शिक्षणाने माणूस स्वतः घडतो आणि समाजालाही घडविण्यासाठी प्रयत्न करतो.शिक्षणाविषयी अगाध श्रध्दा आणि प्रेम असणारे भारतातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. भीमराव आंबेडकर यांना आपण त्यांच्या कार्यामुळे आणि शिक्षणाबद्धल प्रेमामुळे ओळखतो.यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत शिक्षण घेतलं आणि आपल्यातील ज्ञानज्योतीच्या सहाय्याने सम्पूर्ण मानव समुदायाला प्रकाशमान करण्याचं काम त्यांनी केलेले आपल्याला पहावयास मिळते.  त्यानी आपल्या विदवत्तेच्या जोरावर भारतीय संविधान लिहिण्याचं काम देखील केलेले आहे.ते संविधान शिल्पी म्हणून देखील ओळखले जातात.प्रस्तुत लेखात आपण त्यांच्या शिक्षणाचा प्रवास आणि शैक्षणिक कार्याची माहिती घेणार आहोत.

             डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही केवळ व्यक्ती नसून तो एक विचार आहे. त्यांचे जीवन आणि कार्य हे तळागाळातील हजारो वर्षाच्या सामाजिक अन्याय आणि आर्थिक शोषणामुळे भरडलेल्या लोकाकरीता प्रेरणा आहे. ही प्रेरणा केवळ वैचारिक पातळी पूर्ती मर्यादित नाही .तर झोपलेल्या समाजाला जागृत करून त्यांच्यात स्वाभिमान, अस्मिता आणि आर्थिक सबळता निर्माण करण्याच्या कृती कार्यक्रम आहे .जाज्वल राष्ट्रनिष्ठा आणि देश प्रेम काय असतं हे ज्यांना जाणून घ्यायचं असेल त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचायला हवं.


            डॉ. बाबासाहेब म्हणजे महाराष्ट्राच्या मातीने विश्वाला आणि देशाला दिलेलं एक अनमोल रत्न आहे. ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षणाला महत्त्व दिलं. समाज परिवर्तनाचा साधन म्हणजे शिक्षण हे ओळखून त्यांनी उच्चविद्याप्राप्त केली आणि समाजालाही संदेश दिला की  "शिका !,संघटित व्हा! आणि संघर्ष करा!". 

             अशा या महात्म्याचा जन्म सुभेदार रामजी सपकाळ आणि भिमाबाई यांच्या पोटी दिनांक 14 एप्रिल 1891 रोजी 'महू' नावाच्या लष्करी छावणीत झाला. आपल्या आईच्या पोटी जन्म घेणारे भीमराव हे चौदावे आपत्य होते. आईच्या नावावरून त्यांचं नाव 'भीम 'असे ठेवण्यात आले. लहानपणी भीमराव अत्यंत खोडकर ,दंगेखोर होते. त्यांना अभ्यासाची फारशी आवड नव्हती. परंतु त्यांचे वडील रामजी यांची इच्छा होती की त्यांनी खूप शिकावे.  आंबेडकर जेव्हा दुसरी मध्ये शिकत होते.तेव्हा त्यांना आंबेडकर नावाचे गुरुजी होते.त्यांनी डॉ. बाबासाहेबांचे आडनाव अंबावडेकर हे त्यांचा गावावरून ठेवलेलं नाव बदलून आंबेडकर असे ठेवले.त्यानंतर 07 नोव्हेंबर 1900 मध्ये सातारा येथील सरकारी माध्यमिक शाळेत  त्यांचं नाव दाखल करण्यात आले. आजही 07 नोव्हेंबर हा दिवस डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा "शाळा प्रवेशदिन" म्हणून साजरा होतो. शाळा शिकत असताना त्यांना अस्पृश्यता सारख्या  समस्यांचा सामना करावा लागला. तरी त्यांनी शिक्षण सोडले नाही .इसवी सन 1904 मध्ये भीमराव इंग्रजी चौथी परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे इ.स. 1907 साली उत्तम प्राविण्य गुण घेऊन ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी मॅट्रिक उत्तीर्ण होऊन आपल्या जीवनातील यशाचा पहिला टप्पा पार केला.


           वयाच्या सोळाव्या वर्षी नऊ वर्षाच्या भगीरथी उर्फ रमाबाई यांच्याशी  त्यांचा विवाह 1907 साली झाला. रमाबाई धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांना अनेक आपत्य झाली पण 'यशवंत' हा एकमेव मुलगा जगला. विवाहनंतर बुद्धिमान भीमराव मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी चिंतेत होते .वडिलांच्या पेन्शनवर त्यांच्या घराचा उदरनिर्वाह चालत होता. वडील कर्जबाजारी झाले होते.  अशाही परिस्थितीत भीमरावाची शिकण्याची इच्छा होती. त्यांची ही इच्छा त्यांचे गुरु कृष्णाजी केळुसकर आणि दामोदर यंदे यांनी महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून आर्थिक मदत घेऊन पूर्ण केली.

             महाराजांकडून मिळालेले पन्नास रुपये शिष्यवृत्तीच्या मदतीवर 03 जानेवारी 1908 साली भीमरावांनी मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी 1910 मध्ये इंटरमिजिएट व इसवी सन 1912 साली बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर 01 जून 1913 साली महाराजांनी त्यांना तीन वर्षासाठी दरमहा साडेअकरा पोंडाची शिष्यवृत्ती बहाल केली. शिष्यवृत्ती ची मुदत 14 जून 1916 पर्यंत होती. संस्थानाकडून पॅसेज आऊट फिट खर्च व तीन महिन्याची एकूण 1963 रुपये शिष्यवृत्ती घेतली आणि अमेरिकेहून परतल्यावर किमान दहा वर्षे बडोदा संस्थानात नोकरी करण्याच्या अटीवर जुलै 1913 साली भीमराव न्यूयॉर्क (अमेरिका) रवाना झाले. 1915 साली 'एशंट इंडियन कॉमर्स' प्राचीन भारतातील व्यापार हा 42 पृष्ठाचा शोध निबंध लिहून वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी कोलंबिया विद्यापीठाची एम. ए. ची पदवी संपादन केली. त्यानंतर अर्थशास्त्र व राजनीति या  विषयांचा सखोल अभ्यास केला. "भारताला राष्ट्रीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक  परिशिलन " नामक प्रबंध जून 1916 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने मान्य केला. नंतर 1925 साली " द इव्होल्युशन ऑफ प्रोविजनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया" ह्या प्रबंधावर त्यांना पी.एचडी.ची पदवी प्राप्त झाली. सण 1918 पर्यंत डॉ. बाबासाहेबांनी एम. ए. पी.एचडी.आणि एम.एससी. व बार-आट-लॉ इतक्या पदव्या प्राप्त केल्या होत्या.

            नंतर डॉ. बाबासाहेबांची भेट राजर्षी शाहू महाराज बरोबर झाली. यांच्याकडून आर्थिक मदत घेऊन बाबासाहेबांनी बॅरिस्टर होण्याचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी लंडनला गेले. 05 जुलै 1920 मध्ये 'सिटी ऑफ एक्सीटर' या बोटीने ते लंडनला रवाना झाले. लंडनला पोहोचल्यानंतर 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स' या संस्थेमध्ये एम .एससी साठी प्रवेश घेतला 20 जून 1921 मध्ये 'प्रोव्हिजनल  डिसेंटरलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया' हा विषय घेऊन ते एम. एससी झाले. पुढे अत्यंत पराकाष्टेने लिहिलेला "द प्रॉब्लेम ऑफ द रुपी " 'चलनाचा प्रश्न' हा प्रबंध डॉक्टर ऑफ सायन्स करिता लंदन विद्यापीठाला 1922  साली सादर केला. याच काळात 28 जून 1922 रोजी भीमरावांना "गेज इन "या संस्थेने ही बार ॲट लॉ ( बॅरिस्टर )ही पदवी प्रदान केली. त्यांनी अर्थशास्त्र, समाजशास्त्र ,मानववंशशास्त्र, धर्मशास्त्र, निबंध शास्त्र, इतिहास, राजकारण इत्यादी विषयात पारंगत होऊन 14 एप्रिल 1923 साली भारतात परतले. त्यांचा प्रबंध 1923 च्या अखेरीस मान्य करून लंडन विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली. उच्च शिक्षणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक बुद्धिमान आणि सामर्थशाली पुरुष झाले. तीन विश्वविद्यालयात त्यांनी ज्ञान संपादनासाठी तपश्चर्या केली. जुलै 1923 साली डॉ. आंबेडकरांनी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून वकिली व्यवसायास सुरुवात केली.


       डॉ. बाबासाहेब शिक्षणाची आवड असणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी स्वतः शिक्षण घेऊन समाजापुढे एक आदर्श ठेवला. स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी  देशासाठी आणि समाजासाठी केला. त्यांनी समाजकार्य, राजकारण, शिक्षण आणि वृत्तपत्र चालवून अशिक्षित समाजाला दिशा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला .त्यांनी समाजाच्या हितासाठी बहिष्कृत हितकारणी सभा २० जुलै 1924 साली सुरू केली तर समता सैनिक दलाची स्थापना मार्च 1926 साली केली. त्यांनी राजकारणामध्ये ही पाऊल ठेवत स्वतंत्र मजूर पक्ष 15 ऑगस्ट 1936 साली तर ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना 19 जुलै 1942 साली केली. 3 ऑक्टोबर 1957 साली त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना केली. त्यांनी समाजाला जागृत करण्यासाठी मूकनायक (31 जानेवारी 1920), बहिष्कृत भारत (3 एप्रिल 1927), समता (29 जून 1928), जनता (24 नोव्हेंबर 1930), प्रबुद्ध भारत (4 फेब्रुवारी 1956)... इत्यादी वृत्तपत्रे सुरू केली.


           डॉ. बाबासाहेबांनी शैक्षणिक संस्था देखील स्थापन केल्या. त्यामध्ये डी क्लास एज्युकेशन सोसायटी 14 जून 1928 मध्ये आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी 08 जुलै, 1945 मध्ये स्थापन केल्या.  

              डॉ.बाबासाहेबांनी प्राथमिक, उच्च शिक्षण आणि स्त्री शिक्षण विषयक आपले स्वतंत्र विचार देखील मांडले आहेत. प्राथमिक शिक्षणाविषयी ते म्हणतात की प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे असावे. प्राथमिक शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाने स्वतः उचलावी प्राथमिक शिक्षणातून पायाभूत ज्ञान देण्यात यावे. त्यासाठी जो खर्च येईल ते सरकारने टॅक्स च्या रूपात गोळा करून खर्च करावा.

           उच्च शिक्षण घेणाऱ्या युवा पिढीला ते म्हणतात "भारतीय विद्यार्थिनी ही नवनव्या जीवन मूल्याची दखल घेतली पाहिजे आणि ती आचरणात आणण्यासाठी सिद्ध राहिले पाहिजे .आपल्या विद्यादाई संस्था हे नवे तत्त्वज्ञान आपल्या शिक्षण क्रमांक घालतात की नाही याकडेही पाहिले पाहिजे." ते म्हणतात विद्या, प्रज्ञा ,करुणा, शील व मैत्री ही पंचतत्वे लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे .असा त्यांचा आग्रह होता.  

         डॉ. बाबासाहेब हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी प्रथम प्रयत्न केलेले दिसून येतात ते म्हणतात "एक पुरुष शिकला तर केवळ एक व्यक्ती शिकते मात्र एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंबाची सुधारणा होते". हे बाबासाहेबांचे स्त्री शिक्षण विषयाचे विचार होते. त्यांनी 'हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनिती' या निबंधातून स्त्रियांच्या अन्यायाला वाचा फोडली .त्यांनी मुलीच्या शिक्षणावर अधिक भर दिला. स्वतः स्थापन केलेल्या मुंबई आणि औरंगाबाद येथील शैक्षणिक संस्थांमध्ये मुलांबरोबर मुलींनीही प्रवेश घेण्याचे जाहीर आव्हान केले .शिवाय  मुलींसाठी बसची सोय केली .

         अशाप्रकारे शिक्षणाविषयी अत्याधिक प्रेम असणाऱ्या या महामानवाचा 06 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले. त्यांचा मरणोत्तर त्यांना 14 एप्रिल1990 रोजी 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. अशा प्रकारे भारताच्या इतिहासातील महापुरुष आपल्यात कीर्ती रूपाने अजरामर आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाला शतशः नमन.

लेखक आनंद जाधव

शिक्षक, 

कोटमाळ, ता हुलसूर जि. बिदर (कर्नाटक राज्य)

9535503233

Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग